नांदेड ( मिलिंद व्यवहारे) :
धावपळीच्या आयुष्यात तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांनी केले आहे. शुक्रवारी ( ता. 5 ) जिल्हा परिषदेत राष्ट्रीय असंर्सगजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत नांदेड जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, व्ही.आर.कोंडेकर, एस.व्ही.शिंगणे, डी.यू.इंगोले, जिल्हा रुग्णालयाचे डॉ.एच.आर.कुंटूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण मुंडे, डॉ.व्ही.आर.मेकाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.बी.कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती झीने, महालॅबचे डॉ.किरण खैराटकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
शासकीय कर्मचारी हे जास्तवेळ कार्यालयात राहतात. या धावपळीच्या युगात माणसाच्या आरोग्यावर विविध परिणाम दिसून येत आहेत. कामाच्या ताणतणावातून कर्मचारी आपल्या आजारांकडे दूर्लक्ष होते त्यामुळे त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होते आणि त्याचा परिणाम दैनंदीन कामावर होतो. कामातील गतिशिलता वाढावी यासाठी आरोग्य समृध्द राहणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा परिषदेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्पना मांडली आणि या शिबीराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय असंर्सगजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत नांदेड जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आज आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.
शिबीराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी कर्मचा-यांनी तणावमुक्त राहून कार्यालयात काम करावे. वेळेवर आरोग्याची तपासणी करावी व योग्य उपचार करावेत. आयुष्यात सगळयात मोठी मिळकत हे चांगले आरोग्य आहे. तेव्हा ते जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि दीर्घ आयुष्यासाठी तणावमुक्त व व्यसनमुक्त जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या आरोग्य शिबिरात पाणी, हवा याशिवाय होणा-या आजारांची तपासणी करण्यात आली .
आपल्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करण्याची गरज आहे. आरोग्य निरोगी रहावे, शरीर स्वस्थ रहावे यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी आणि आपले आरोग्यमान उंचवावे असे आवाहन शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे यांनी केले.
या आरोग्य शिबिरात पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 629 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 534 पुरुष व 95 स्त्री कर्मचा-यांचा समावेश होता. शिबिरात रक्तातील जेवणापूर्वीची व जेवणानंतरची साखर तपासणी, ब्लड प्रेशर, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, रक्तगट तपासणी, आदी तपासण्या यावेळी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे दंत चिकित्सा, मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आदी तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या समुहाने केल्या आणि शिबिरार्थींना औषधोपचार केले आणि रुग्णांना आरोग्य सल्ला आंतरव्यक्ती संवादातून देण्यात आला. तर ह्रदय रोगाची तपासणी, डोळयाची तपासणी, दाताची तपासणी आदीच्या उपचाराकरीता 90 कर्मचा-यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी सल्ला देण्यात आला.
शिबिर यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील अधिकारी कम्युनिटी हेल्थ ऑफीसर्स, औषध निर्माण अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य कर्मचारी, महालॅबचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदींसह शिबिरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.बी.कदम, डॉ.दिपक गोरे, डॉ.हजारी, डॉ.पूर्वा सरकार, डॉ.सुजाता राठोड, डॉ.रंजना देशमुख, डॉ.इंगळे आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment