शिवणी ता. किनवट ( प्रकाश कारलेवाड ) : येथून १० कि.मी. अंतरावर असलेल्या चिखली (ई) गावातील तीन शाळकरी मुलांचे पाण्यात बुडुन निधन झाल्याने चिखली गावासह शिवणी परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, चिखली ते म्हैसा रोडवर गावलगत नाला असून मागील काही दिवसात पाणी भरपूर पडल्याने परिसरातील नदी नाले वाहू लागले आहेत. याप्रमाणेच हा नालासुध्दा तुडूंब भरलेला आहे.
पोहण्याची ईच्छा झाल्याने चिखली (ई) येथील काही विद्यार्थी पोहण्यासाठी या नात्यावर गेले. त्यांना पोहणे येत नसतांना सुध्दा तिघे जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. बराच वेळ झाल्यानंतर आपले सहकारी पाण्यात कुठे दिसून येत नसल्याने काठावरील मुलांनी त्यांना जोरजोराने हाका मारण्याचा प्रयत्न केला. पण थोडयाच वेळात दोन मुलं पाण्यावर तरंगत असल्याचे दिसल्याने नाल्याकाठी बसून असलेल्या बालकांनी जोरजोराने आरोळ्या ठोकल्या. त्यामुळे आजूबाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी धावून नाल्याजवळ आले. त्यांना दोन मृत देह पाण्यावर तरंगताना दिसले. शेतकऱ्यांनी लगेच पाण्यात उतरून त्या दोन मृत देहांना बाहेर काढले. पण आपला आणखी एक सोबती दिसून येत नसल्याचे काठावरील मुलांनी शेतकऱ्यांना सांगितले. तेव्हा शेतकऱ्यांनी पुन्हा पाण्यात उड्या मारून तिसऱ्या मुलाला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केला असता त्या तिसऱ्याचे शरीर नाल्याच्या कडेला पडून दिसले. ते शरीर गरम व थोडे -थोडे श्वाशोश्वास घेत आहे, असे लक्षात आल्याने त्या बालकाला लगेच दुचाकीवर बसवून प्राथमिक आरोग्य केंद्र शिवणी येथे आणण्यात आले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी डॉ. कानिफनाथ मुंडे यांनी त्यास मृत घोषित केले आणि पोलिसांना माहिती दिली. वरील दोन व हा एक अशा तीन शाळकरी विध्यार्थींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, या घटनेची इस्लापुर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदन करून मृतदेह परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले. श्रीकर गोपाल नागुवाड वय 14 वर्षे, रितेश विठ्ठल देशेटीवार वय 11 वर्षे व गंगाधर लक्ष्मण भंडरवाड वय 12 वर्षे अशी ह्या शाळकरी मुलांची नावे आहेत.
या घटनेची माहिती चिखली येथील सरपंच देविदास तोटवाड, विठ्ठल शिंगरवाड, सुरेश झरीवाड यांना कळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ही खबर तात्काळ त्यांनी इस्लापुर पोलीस स्टेशनला दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किणगे व पोलिस निरीक्षक श्रीकांत कांदे, पोलीस कर्मचारी रामेश्वर आलेवाड, संदीप साळवे, मंडळ अधिकारी सानप यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. ही बातमी कळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बालाजी आलेवार, शिवसेनेचे गजानन बच्छेवार, भोजराज देशमुख यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
No comments:
Post a Comment