पुणे : दि. ०४ ऑक्टोबर २०२१ पासून ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांचे उद्बोधन करण्यासाठी ऑनलाइन बेबीनार आयोजित करण्यात आला होता.
शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी, विद्या परिषदेचे संचालक एम डी सिंह, कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. समिर दलवाई, पद्मश्री पोपटराव पवार, शिक्षण तज्ज्ञ हेमांगी जोशी, माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे आदींनी या संमेलनात क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांचे उद्बोधन केले.
चर्चासत्राची सुरुवात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने बनविण्यात आलेल्या 'चला मुलांनो चला 'हे चलचित्र सादर करून करण्यात आली. बरेच दिवस शाळा बंद असल्याने मुलांची शाळेत जाण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारी करणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असणार आहे .
टास्क फोर्स मधील सदस्य डॉ. समीर दलवाई यांनी सांगितले की कोरोना काळात बऱ्याच कुटुंबावर मोठा आघात झाला असल्याने व बऱ्याच कालावधीनंतर मुले शाळेत येत असल्याकारणाने शिक्षकांनी सुरुवातीला काही दिवस विद्यार्थ्यांना एकमेकांशी मनमोकळेपणे संवाद साधण्यासाठी किमान 2 आठवडे वेळ देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी सुरुवातीला होणारा हा सुसंवाद महत्त्वाचा असेल.
कोरोनामुक्त गाव व कोरोना कालावधीतही कोविड नियमांचे पालन करून हिवरे बाजार येथे आदर्श पद्धतीने शाळा शंभर दिवस सुरू ठेवणे बाबतचा प्रयोगाची यशस्विता पद्मश्री पोपटराव पवार यांनी विशद केली.
शिक्षण तज्ज्ञ हेमांगी जोशी यांनी कोरोना काळात मुलांमधे निर्माण झालेल्या चिडचिडेपणा, भांडखोर स्वभाव अशा वर्तन समस्या शिक्षक व पालक यांनी समजून घेऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणे वागावे, विद्यार्थ्यांना समजून घेऊन अध्यापन करावे तसेच शिक्षकांनी सुद्धा स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपावे, असे आवाहन केले.
माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे यांनी कोरोना काळात शिक्षकांनी अध्ययन अध्यापनाच्या बाबतीत राबविलेल्या विविध प्रयोगाचे कौतुक करून शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी , प्रसार माध्यमे, सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते मोलाची भूमिका बजावू शकतात, असा आशावाद व्यक्त केला.
शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले की विद्यार्थी हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असून शाळा सुरू झाल्यानंतर त्यांचे आरोग्य व सुरक्षितता जपणे हे समाजातील प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. शासनाने विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता यांचा बारकाईने विचार करून शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी आरोग्य विभाग व टास्क फोर्स यांच्याशी सल्लामसलत करून मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे हे समाजातील प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. बऱ्याच कालावधीनंतर शाळा सुरू होत असल्याकारणाने विद्यार्थ्यांच्या मानसिक व भावनिक स्वास्थ्याचा विचार करून शिक्षक पालक यांनी विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन करावे., असेही शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी नमूद केले.
राज्यातील क्षेत्रीय अधिकारी, शिक्षक,पालक व विद्यार्थी यांच्याकडून शासनाने शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी निर्गमित केलेल्या सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल असा विश्वास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी व्यक्त केला.
ऑनलाइन वेबिनारचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी केले. परिषदेतील माहिती तंत्रज्ञान व कला क्रीडा विभाग यांनी संयुक्तपणे या ऑनलाईन बेबीनारच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment