*आनंद मनात माझ्या मावेना रे मावेना।*
*आनंद मनात माझ्या मावेना।।*
ह्या मनसोक्त आनंदाची स्थिती आज विद्यार्थी आणि पालक यांची झालेली आहे. ज्या दिवसाची आतुरतेने सोन्यासारखी वाट पहात होते. तो दिवस आज उजाडला. आज शाळेची घंटा वाजणार,म्हणून सर्व पालक वर्ग हर्षोल्हासात आहेत. पालक चिंतामुक्त झाला आहे.
जवळजवळ दोन वर्षापासून विद्यार्थी आणि शाळा यांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दुर गेला होता. त्यावेळेस कोरोनाची परिस्थितीही गंभीरच होती. कारण दुसऱ्या लाटेने होत्याचे नव्हते केले होते. 'जो बच गया वही सिकंदर' अशीच परीस्थिती झाली होती. पण आपण त्यावर विजय प्राप्त केला आहे. हा अविस्मरणीय विजयच म्हणावा लागेल. त्यात लसीकरणामुळे परिस्थिती खूप आटोक्यात आली. जनतेनेही सरकारला सहकार्याचा हात दिला. आज ब्यांशी कोटी लोकांचे लसीकरण झाले. हे वृत्तपत्रात वाचून प्रत्येक पालकांना धीर आला. कोरोनाच्या संकटावर आपण मात केली, याची जाणीव व्हायला लागली. शाळेची वाजणारी घंटा वाजली, ही त्याचीच पावती आहे. हे सर्वांसाठी आनंदाचे आहे. आपण तिसरी लाट रोकू शकलो. याचा अभिमान प्रत्येकाच्या मनात उंचावू लागला.
विद्यार्थी जुन महीन्यापासूनच नवा वर्ग, नवे दफ्तर, नवा गणवेश, नवीन साहित्य घेवून शाळेच्या तयारीत होते. पण काही अडचणीमुळे ते शाळेचा आनंद घेवू शकले नाहीत. यासाठी शासनाने 'शाळा बंद शिक्षण सुरु ' या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पुरविले. पण यासाठी अनेक अडचणींचा सामना विद्यार्थी आणि पालक यांना करावा लागला. प्रत्यक्ष शिक्षण आणि अप्रत्यक्ष शिक्षण यामध्ये खूप फरक आहे. कारण प्रत्यक्ष शिक्षणामध्ये अध्यापनासोबत शिस्त आणि संस्कार यांची शिदोरी सोबत असते. आणि तीच जीवन सुसंस्कृत करीत असते. अस म्हणतात की, शिक्षणाला शीलाची जोड असेल, तरच ते शिक्षण आदर्शवादी आणि मानवतावादी होवू असते.
खरे तर शाळेत सुसंस्कारांची बिजे कोवळ्या मनावर परिपाठातून दररोजच पेरली जातात. मानवतेची व देशभक्तीची रुजवण होत असते. निधर्मीय प्रार्थना, बोधकथा, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि संविधानाची प्रास्ताविका हा परिपाठातून मिळणारा बहुमोल ठेवा आदर्शवादी नागरिकांची रोपटे उगवित असतो.
वर्गात विद्यार्थी एकाग्रचित होतो. जरी तो घरी मोबाईलवर शिक्षण घेत असेल, तर तो सारखे त्यावर बघून एकाग्रचित होण्यापेक्षा आजुबाजुच्या आवाजाने विचलीत होतो. लवकरच कंटाळवाना होतो. डोळ्यांच्या आजाराचा बळी होतो. त्यातही नेटवर्किंगच्या समस्या सुरुच असतात,त्यामुळे त्यास योग्य तो लाभ होऊ शकत नाही. तसेच महागाई मुळे वैयक्तिक मोबाईल घेणे परवडणारे नसते. तर पालकांच्या पश्चात मुले त्यावर गेम खेळत असतात. यामुळे पालक वर्ग त्रासून गेले होते. याही व्यतिरीक्त खेळण्याचे प्रमाण वाढले होते. मुले व्यसनाधीनतेकडे वळले होते. बालमजुरीचे प्रमाण वाढले होते. गरीब पालक खाजगी शिकवणी वर्गाची फिस भरु शकत नाहीत. त्यामुळे नवोदय,शिष्यवृत्ती सारख्या अन्य परिक्षेपासून त्यांना वंचित रहावे लागत होते. शाळा सुरु झाल्यामुळे या आणि अन्य कटकटीतून पालक मुक्त होताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर भरभरून आनंद वाहत आहे.
शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होताना दिसत आहे. कारण पालक शिक्षणासाठी जीवाची पर्वा न करता काम करत असतो. आपल्या मजूरीतील अर्धा हिस्सा तो शिक्षणासाठी जपून ठेवून अर्ध्या खर्चात घर संसार भागवित असतो. कारण तोच त्याचा उद्याचा भावी काळ असतो. अस म्हणतात, शिक्षण विकास हाच देशाचा विकास असतो, हे विशेष होय. म्हणून समाज सुधारक आणि विचारवंतानी शिक्षणाविषयी मोलाची कामगिरी बजावली.
छोटे वर्ग हाच शिक्षणाचा पाया आहे. आणि हाच पाया कच्चा राहिला तर कळस मजबूत होणार नाही. हीच काळजी पालकांच्या मनात घर करून होती. ती नक्कीच आता दुर झाली आहे.
शिक्षण ही अशी गरज आहे की अन्न आणि शिक्षण हे तितकेच महत्त्वाचे आहेत. ते मानवापासून कधीच वेगळे करता येणार नाहीत. कारण अन्न हे पोटाची भूक भागवते. शिक्षण विनयशील जगण्याची.
म्हणून भविष्यात अन्न आणि विद्या याची भूकमारी होवू नये. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण हे कुपोषण न परवडणारे आहे. त्यासाठी भविष्यात कोरोनाची लाट येणार नाही. यासाठी शासनाने दिलेले नियम पाळून योग्य ती काळजी घेणे हे प्रत्येकाची जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे. तरच आपणास शाळेचा मनसोक्त आनंद घेता येईल. विकासाचा कळस गाठता येईल.
-बाबुराव पाईकराव,
डोंगरकडा
9665711514
No comments:
Post a Comment