हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, औंढा, वसमत तालुक्यात व इतर ठिकाणी जोरदार अतिवृष्टीने व कयाधु नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी यावेळी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत देण्यात यावी असे निर्देश संबंधितांना दिले आहेत.
जिल्ह्याच्या अनेक भागात मान्सून सक्रिय झाला असून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पहाटे जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील जलालदाभा, काकडदाभा, फुलदाभा, लाख , मेथा, येहळेगाव (सोळंके), तर कळमनुरी तालुक्यातील रेडगाव ,दांडेगाव, सालापूर, जवळापांचाळ, डोंगरकडा, सुकळी वीर, वरुड, डोंगरगाव आणि वसमत तालुक्यात गिरगांव, कुरुंदा तर कयाधु नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतीचे जिल्ह्याच्या इतर भागात जोरदार अतिवृष्टी होऊन शेतातील सोयाबीन, कापूस, हळद, तूर या खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती मात्र अनेक ठिकाणी बियाणांची उगवण न झाल्यामुळे व काही ठिकाणी अतिवृष्टीने पीक करपून गेले त्यामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला होता.त्यानंतर आता या भागात गुरुवारी पहाटे ढगफुटी झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाऊस झाला .या पावसामुळे हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली, याभागातील नदी-नाले व ओढ्याना मोठा पूर आल्यामुळे हजारो जनावरे दगावली आहेत. तसेच नदीकाठी असलेल्या घरांचे शेतातील आखाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी सर्व परिस्थितीची माहिती घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे तात्काळ पंचनामे करून विनाविलंब आर्थिक मदत देण्यात यावे अशी मागणी केली यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे संबंधितांना असे निर्देश दिले की,नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी.हिंगोली लोकसभा क्षेत्रातील विविध प्रश्नांवर यावेळी उभयंतामध्ये चर्चा झाली .
No comments:
Post a Comment