अनेक अपघाती समस्यांवर मात करून आंबेडकरी चळवळीसाठी निर्धोक उभा राहणारा कार्यकर्ता : अॅड. मिलिंद सर्पे
किनवट :
मिलिंद उद्धवराव सर्पे १९६६ मध्ये दोन अडीच वर्षांचे असतील ... एका अपघातात त्यांचे पाठीचे तीन मनके तुटले. मरता - मरता ते वाचले. पुनर्जन्मावर विश्वास नाही, पण त्यावेळी त्यांना बोनस आयुष्य मिळाले, असे मी मानतो.त्यावेळी त्यांच्या घरी आजी, आई व आत्या यांच्या शिवाय करता पुरुष कुणीही नव्हता. सहा महिन्यांपुर्वि व्यवसायाने शिक्षक असलेले त्यांचे वडील क्षयरोग या आजारावर उपचार घेत असतांना आदिलाबाद येथील सरकारी दवाखान्यात मरण पावले. वर्ष होते १९६६. तेथेच त्यांच्या वडिलांचा अंत्यविधी उरकण्यात आला होता. त्या वेळेस त्यांचे वय होते अवघे दोन वर्षे.
यानंतर सहा महिन्यांतच त्यांचा अपघात झाला. घरात कुणीही कर्ता पुरुष नसल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न झाला नसावा किंवा त्या काळात चांगला डाॅक्टर किनवट सारख्या भागात असण्याची शक्यता कमीच होती.
अपघातामुळे पुढील चार वर्षे त्यांना चालता बोलता येऊ शकले नाही. या काळात त्यांचा मुक्काम बेडवरच होता. चालतांना त्यांना दोन पायासह दोन हाताचाही उपयोग करावा लागत असे. पुढे चालून त्यांना कसे बसे चालता बोलता येऊ लागले. त्यावेळेस त्यांचे वय होते अवघे सहा वर्ष. चालता येत असल्याने त्यांना आत्याने शाळेत टाकले १९६९ मध्ये पहिलित.
त्यांच्या वडिलांचा जन्म ब-यापैकी सधन शेतकरी कुटुंबात झाला असल्याने व त्यांच्या आई वडिलांना तीन मुली व एकच मुलगा असल्याने १० वी नंतर त्यांच्या वडिलांनी औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयामधून १९६३ साली बी.एसी.केली. त्यानंतर ते किनवटला आले व त्यांनीशिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांचा जन्म झाल्यावर त्यांचे नाव ठेवले "मिलिंद".
त्यांचे वडील विद्यार्थी असतांनाच सोपानराव धन्वे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळच्या चळवळीत काम करीत होते.
मी सहावीत असताना किनवटला दलित पँथरची प्रा. पी.एस.धन्वे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना झाली. ते वर्ष होते १९७६. तेंव्हापासूनच त्यांना चळवळीचे मोठे आकर्षण होते. त्यांनीही पॅंथर चळवळीत सहभाग घेतला.धन्वे सरांनी त्यांना शिशू दलित पँथरचा अध्यक्ष केले. तेंव्हापासूनच ख-या अर्थाने त्यांच्या आंबेडकरी चळवळीतील सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली. त्या पुढील काळात त्यांनी प्रा.(अॅड.) पी.एस.धन्वे, दादाराव कयापाक, सुरेशदादा गायकवाड व डाॅ.अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता म्हणून आपल्या जीवनाला घडविले .
आंबेडकरी चळवळीत भारावलेल्या काळातील एका दिवशी सुरेशदादा गायकवाड हे बोलतांना त्यांना म्हणाले की, "तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी नौकरी करु नये".त्यांचे हे म्हणने त्यांच्या बालमनात कायमचे घर करुन गेले.पुढे चालून त्यांनी चार पदव्या मिळवल्या, परंतु नौकरी साठी कुठेही साधा अर्ज सुध्दा केला नाही.अनुकंपा धर्तीवर त्यांना नौकरी मिळवणे अवघड नव्हते तरीसुद्धा.
आंबेडकरी चळवळ,डावी चळवळ व परत फुले-आंबेडकरी चळवळ असा त्यांचा प्रवास झाला. दरम्यान मोर्चा, उपोषणे,धरणे आंदोलन, तुरुंगवास, पोलिस लाठ्या खाण्याचाही अनुभव त्यांनी घेतला. आजही त्यांच्यातला कार्यकर्ता जिवंत आहे. शरीरात शेवटचा श्र्वास असेपर्यंत तो जिवंत राहणार आहे.
अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी चळवळीसाठी आपलं आयुष्य वेचूनही शिक्षण पूर्ण केले. परंतु आपले गाव सोडले नाही. त्यांचे वर्गमित्र आज महाराष्ट्रातील नामवंत दैनिकाचे व वृतवाहिण्याचे संपादक आहेत. आज हे सर्व लिहिल्याचे कारण म्हणजे त्यांचा १० मे हा वाढदिवस.... वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी एल.एल.बी.केले. यावेळी त्यांचा मुलगा त्यांचा क्लासमेट होता. ते यात उत्तीर्ण झाले . पत्रकारितेतील पदव्युतर पदवी घेणारे ते किनवट तालुक्यातील एकमेक बातमीदार आहेत . सकाळपरिवारात काम करणारे ते झुंजार बातमीदार आहेत ...
त्यांना मी म्हणेन... वाढदिवस...बोनस आयुष्याचा...!
एका सामाजिक कार्यकर्त्यांचा लेखाजोखा..
ReplyDeleteखुप छान !