आपल्या वागण्यातून व जगण्यातून 'नागसेन' दर्शविणारे प्राचार्य राजाराम वाघमारे
-मारोती सुंकलवाड
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदाचे प्राचार्य राजाराम गोविंदराव वाघमारे अध्यापनाची 29 वर्षे प्रदीर्घ सेवा करून नियतवयोमानपरत्वे आज सोमवार (दि. 31 ) रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्याची ओळख करून देत आहेत त्यांचे बालपणापासूनचे सवंगडी मारोती सुंकलवाड - संपादक
यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या उमरखेड तालुक्यातीत गाडी (वन) या आदिवासी बहूल खेडे गावात एका गरीब शेतकरी कुटूंबात दि.5 मे 1963 रोजी राजाराम वाघमारे यांचा जन्म झाला. गरीबीतल्या सर्व हालअपेष्टा त्यांच्या वाट्याला आल्यात. वडीलांची पित्रृछाया त्यांना लाभली नाही. परंतु सामाजिक जाणीव जागृती असलेल्या गणपतराव वाघमारे या त्यांच्या मोठ्या भावाने वडीलकीच्या नात्याने अपार कष्ट सोसून त्यांना वाढवले. शिक्षणाची कास धरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात एम.एस्सी., बी.एड्. पर्यंतचे शिक्षण त्या काळी शिकविले. आम्ही त्यांचे बालमित्र असल्यामुळे त्यांच्या एकुणच जीवनकार्याशी सुपरिचित आहे.
मिलिंद मध्येच त्यांच्यातला शिक्षक घडत गेला. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा ता. किनवट जि.नांदेड येथे सन 1992 ला सहशिक्षक पदावर रुजु होऊन उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य पदापर्यंत पदोन्नतीने पोहचून त्यांनी अध्यापनाबरोबरच शैक्षणिक प्रशासन प्रामाणिक व उत्तमरित्या जपून सांभाळले.
अत्यंत नेक, चारित्र्यसंपन्न, शिस्तप्रियता जपून त्यांनी एक आदर्श निर्माण केला. त्यांचे प्रती विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शिक्षकेत्तर वर्गात आदरयुक्त भीती वाटत राहीली. साध्या राहणीमानातील आकर्षक व्यक्तीत्वाचा त्यांचा दरारा सगळ्यांना खास भावला आहे. हेच त्यांचे विशेष गुणपैलू होय.
वक्तशिरपणा, कर्तव्यतत्परता त्यांनी निवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळून आदर्श शिक्षक म्हणून जगून दाखविले. पेशानेच नाही तर, वृत्तीने देखील शिक्षक म्हणून 29 वर्ष इतकी प्रदीर्घ अध्यापन सेवा बजावून त्यांनी ज्ञानदानाचे मोलाचे कार्य केले. त्यांच्यातील स्वाभाविक दातृत्वाचं व्यवहारिक दर्शन सगळ्यांना दिसलं.
महात्मा फुले विद्यालयात दर्जेदार शिक्षण देवून शेकडो विद्यार्थी विविध क्षेत्रात नोकरी, व्यवसाय करीत आहेत. हा माझा विद्यार्थी आहे, असं स्वाभीमानानं सांगावं असं प्रत्येक शिक्षकास वाटत असते. त्याप्रमाणे राहूल वाघमारे हा कोपरा येथील अत्यंत गरीबीतला असहाय्य विद्यार्थी वरिष्ठ वैज्ञानिक या पदावर भारतीय वैज्ञानिक अंतराळ विज्ञान संशोधक संस्थेत (इस्त्रो) कार्यरत आहे. त्यांच्या या विद्यार्थ्याने महात्मा फुले विद्यालयाबरोबरच किनवटचेही नाव गाजविले आहे. याचा सार्थ अभिमान संस्थाचालक अभियंता प्रशांत ठमके यांनाही वाटत असावा, हे नक्की.
ते नांदेडला आल्याचं कळाल्यावरून त्यांना माननीय खासदार हेमतंभाऊ पाटील यांनी घरी बोलावून त्यांचा यथोचित सत्कार, गौरव केला. निवृत्तीनंतरही त्यांच्यातला शिक्षक समाजाला सदैव दीपस्तंभासारखा दिशादर्शक ठरावा व उत्तरोत्तर त्यांच्या हातून चांगले कार्य घडत जावो, ह्या त्यांनी शुभेच्छा दिल्यात.
खरोखरच मिलिंद महाविद्यालयाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे "मिलिंदचा प्रत्येक विद्यार्थी नागसेन व्हावा, " हे वागण्यातून व जगण्यातून प्राचार्य राजाराम वाघमारे यांनी दाखवून दिले आहे. आयुष्याची संध्याकाळ गोड व्हावी, हीच सदिच्छा!
-मारोती सुंकलवाड
दिशा समिती सदस्य, नांदेड.
No comments:
Post a Comment