मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शिवसेना नेता एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुरत व सुरतहून आसाम मध्ये आपला डेरा नेला आहे.36 आमदार आपल्या कडे असल्याच दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना हादरा बसला आहे. बंडखोर नेते कोणाच्याही संपर्कात येऊ नये म्हणून आसाम मधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह संभाषणात आपल्या शिवसैनिकांना भावनिक आवाहन करून आपले शासकीय निवासस्थान सोडून शिवसेनेचे श्रध्दास्थान असलेल्या बांदा येथील निवासस्थानी गेले आहेत. सदा सरवणकर, दिलीप लांडे या आमदारांनी सुध्दा एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रतिनिधित्व स्वीकारले आहे यामुळे मुंबईतील शिवसैनिक संतप्त झाले. शिवसेना स्टाईलमध्ये त्यांनी त्यांच्या कार्यालयाचा समाचार घेतला. मुंबईतील राजकीय परिस्थिती पाहून मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू करण्यात आले आहे. शिवसेना नेत्यांनी आपल्या शिवसैनिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेना शाखा व आमदारांच्या आसपासच्या परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाला बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे नाव दिल्यामुळे शिवसेनेचे आमदार व कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर व सुनिल प्रभू यांनी आपल्या समर्थक शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
पक्षातील बंडाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठक मुंबईत सेना भवनात झाली . सदर बैठकीत पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बंडखोरी करणाऱ्या गद्दार नेत्यांचे बंड मोडून काढण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी या राष्ट्रीय कार्यकारिणत महत्वपूर्ण काही ठरावही मंजूर करण्यात आले आहेत.पक्षातील यापुढील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शिवसेना पक्ष प्रमुखांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार कारवाई होणार आहे.
एकनाथ शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे नावाने गट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही असा ठराव ही राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असे ठरवल्याचे असल्याच्या वृत्तामुळे या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरेंचं नाव कुणालाही वापरू देऊ नये यासाठी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला पत्र देण्यात येणार आहे. कायदेशीर लढाई आता सुरू झाली आहे. रविवारची रात्र काळरात्र कोणासाठी ठरणार हे काळच ठरवेल. राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तांत्रिक व कायदेशीर गोष्टी लक्षात घेऊनच यापुढे एकनाथ शिंदे व सेना नेते आपली पावले उचलणार आहेत. ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी आपले शक्ती प्रदर्शन केले आहे. तर दुसरीकडे आसाम मधील हाँटेलातील मुक्काम 30 जुन पर्यंत वाढविण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment